किल्ले रायगडावर दुसरा रोपवे उभारणार

 किल्ले रायगडावर दुसरा रोपवे उभारणार


छत्रपती संभाजी राजे यांची महत्वपूर्ण घोषणा

लॉकडाऊननंतर नुकताच दुर्गराज रायगड सर्वांसाठी खुला झाला आहे. रायगड विकास प्राधिकरणामार्फत गडावर सुरू असलेली कामे मार्चनंतर दोन महिने लॉकडाऊनमुळे पूर्णपणे थांबली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर काही प्रमाणात कामे सुरु करण्यात आली त्या कामांनाही आता पूर्ण वेग आला आहे. या कामांच्या पाहणीसाठी आज छत्रपती संभाजी राजे यांनी रायगडास भेट दिली.
याआधी गडावर लागणारा बराचसा कच्चा माल हा रोपवेतून गडावर आणला जायचा. मात्र रोप वे संस्थेच्या काही कायदेशीर वादामुळे गेल्या काही महिन्यांपासून रोपवे बंद आहे, तो कधी सुरू होईल हे निश्चित नाही. मात्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी याचा गडावरील कामांवर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. यावर बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले,'' अधिकारी दररोज पायी गडावर जातात. पूर्वी रायगड बांधत असताना ज्यापद्धतीने सर्व साहित्य गाढवांवर लादून वरती पाठविले जायचे, त्याच पद्धतीने आजही अव्याहतपणे काम सुरुच आहे. गडावरती सुरु असलेल्या कामांसाठी आवश्यक असलेल्या चुना व रेतीपासून ते अगदी बांधकामाच्या दगडांपर्यंतची सर्व सामग्री हि मजुरांमार्फत गाढवांच्या पाठीवरून गडावर पोहोचवली जात आहे. रोपवे बंद असल्यामुळे याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नाही. शिवाय त्यासाठी गडावरील काम थांबविणे हेदेखील उचित नव्हते. हे काम लवकरात  लवकर मार्गी लागले नाही तर नवीन रोपवे उभारू, असा इशाराही  त्यांनी दिला.
आज प्राधिकरणाचे अधिकारी व जवळपास दीडशे मजूर न थकता आपले काम करत आहेत. अनेक अडचणी समोर असूनही रायगड संवर्धनाच्या कार्यात खंड पडलेला नाही.याचबरोबर शिवभक्तांना रायगडावर  जाऊन महाराजांचे दर्शन घेता यावे यासाठी पुरातत्व विभागाकडे राजसदरेवरील बँरिकेटस् काढण्यात यावेत, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. हत्ती तलावाच्या गळतीचे उर्वरीत काम सुध्दा पुन्हा सुरु करण्यात आले आहे.